सोलापूर शहरात सुमारे 900 कोटी रुपये खर्च करून उजनी ते सोलापूर ही दुसरी जलवाहिनी स्मार्ट सिटी योजनेतून टाकण्यात आली. दरवर्षी कोट्यावधी रुपये पाणीपुरवठा योजनेवर खर्च होतात. मात्र महापालिका अधिकाऱ्यांची मनमानी.. आणि कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे दररोज उजनीतून अडीशे एमएलडी पाणी शहरात घेतले जात असताना शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रचाराचा मुद्दा होणार म्हणून प्रत्येक पक्ष पाण्याचा मुद्दा उचलून धरू लागला आहे. सोमवारी नागपुरात विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून सोलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी- पत्रकार यांची बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. काल विधानसभेत आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाला वाचा फोडली. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाणीपुरवठ्याच्या समस्यांची निवेदन दिले. सोलापूरातील तीनही आमदारांनी पाण्याच्या टाक्या बांधणे तसेच अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी लागणारी 892 कोटी रुपयांचे निधीची फाईल मंजूर करावी अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर आज खासदार प्रणिती शिंदे या लोकसभेत सोलापूरच्या पाणी प्रश्नासंदर्भात आवाज उठवणार आहे. एकूणच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटणार असे दिसते.

