सोलापूर जिल्ह्यातील 33 पैकी चार कारखाने बंद असून फक्त 17 साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर केला आहे; तर अद्यापही 12 साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर न करताच गाळप सुरू केला आहे.
यंदाच्या गाळप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना अक्कलकोट, संतनाथ साखर कारखाना वैराग, मकाई साखर कारखाना करमाळा, तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखाना असे चार साखर कारखाने बंदच राहणार आहेत.उपळाई येथील इंद्रेश्वर शुगर फॅक्टरी व अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर फॅक्टरी हे दोन साखर कारखाने इतर ग्रुप कडे वर्ग करण्यात येत आहेत, त्यामुळे हे साखर कारखाने उशिराने सुरू होणार असल्याचे कळते.
उर्वरित 33 साखर कारखान्यांपैकी केवळ 17 साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला आहे.2800 ते 3001 रुपये दर या साखर कारखान्यांनी जाहीर केला आहे. शेतकरी संघटनांचा वाढीव दर जाहीर करण्यासाठी वाढत असलेल्या दबाव व जिल्हाधिकाऱ्यांनी ऊसदर जाहीर करण्यासाठी साखर कारखानदारांना दिलेला वेळ लक्षात घेता जिल्ह्यातील गाळप सुरू केलेल्या सर्वच कारखान्यांनी ऊसदर जाहीर करणे अपेक्षित होते.मात्र हंगाम उलटून दीड महिने लोटले तरीही या कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला नाही. शिवाय पहिल्या पंधरा दिवसाचे ऊस बिलही काढले नसल्याने ऊस उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

