सोलापुरातील सर्व साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊसदर जाहीर न करताच मोळी टाकण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत महिना अखेर ऊस दर जाहीर करण्याचे आश्वासन कारखानदारांनी दिले असले तरी शेतकरी मात्र या निर्णयाविरोधात आक्रमक दिसून येत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रति टन 3400 ऊस दर जाहीर करून लोकमंगलने पुढाकार घ्यावा असे आवाहन करत, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा कारखाना प्रशासनाला दिला आहे.
कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्राला लागून असलेल्या हवीनाळ कारखान्याने प्रति टन 3140 रुपये दर जाहीर केला तरी तेथील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत चाळीसच्या वर ट्रॅक्टर पेटवून दिले. अशी स्थिती सोलापुरात निर्माण झाली तर त्याला साखर कारखानदार जबाबदार राहतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
तर दुसरीकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टिव्ह टेप असणे बंधनकारक आहे, चालकांनी मद्यपान टाळून वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत विना अपघात वाहतूक करावे अशी सूचना वजा तंबी पोलीस प्रशासनाने दिली आहे.
एकंंदरित ऊस कारखाने किती दर जाहीर करतील हा विषय जितका औत्सुक्याचा ठरला आहे तितकाच तो गंभीर आणि धोकादायक देखील बनत चालला आहे.

