महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असताना बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला दणदणीत विजय मिळाल्यामुळे देशभर भाजपकडून दिवाळीनंतरची दिवाळी साजरी केली जात आहे. सोलापुरात मात्र एकसंग भाजप न दिसता गटागटाचे राजकारण अधिकच गडद होत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या कार्यालयात बाहेर दुपारीच जल्लोष केला. सोलापूर शहर भाजप कार्यालयात सायंकाळी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष कार्यक्रम आयोजित केला होता. सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या दत्त चौकातील कार्यालयात तर दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या मतदारसंघात बिहार निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. भाजपमध्ये आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना विश्वासात न घेता दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश दिले जात आहेत त्यामुळे भाजपमधील गट तटाचे राजकारण वाढू लागले आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये याचा विपरीत परिणाम दिसेल अशी शक्यता आहे.

