…म्हणून २२ फेब्रुवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार चक्काजाम आंदोलन
तेलंगणचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यात राव यांनी आपला मोर्चा महाराष्ट्रातही पक्ष वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. राव यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मोठी ऑफर दिली होती. यानंतर ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. पण आता शेट्टी यांनी राव यांची ऑफर नाकारली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी पैठणमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या फरसह, रविकांत तुपकर यांचं आंदोलन, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज यांसह विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी यानंतर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या न्याय प्रश्नांसाठी सदैव रस्त्यावरची लढाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत. बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांच्यावर लाठीमार करणारे कुणाच्या इशाऱ्यानं काम करत आहेत. तातडीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. अन्यथा राज्यभरच याचा उद्रेक होईल असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
…म्हणून राव यांची ऑफर नाकारली!
तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या ऑफरवर भाष्य करताना राजू शेट्टी म्हणाले, तेलंगणा राज्याचा विकास कसा झाला याबाबत माझी आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची बैठक झाली होती. यावेळी त्यांनी सांगितले की,आमच्या पक्षाचा राष्ट्रीय राजकारणात समावेश झाला असून, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे प्रमुख पद घेऊन,आमच्या पक्षात यावे अशी विनंती चंद्रशेखर राव यांनी केली असल्याचं शेट्टी म्हणाले. मात्र, मी त्यांना नम्रपणे सांगितले की, तुमची योजना चांगली आहे, भूमिका देखील योग्य आहे. पण मी शेतकरी चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतलेला कार्यकर्ता असल्याने त्यांची ऑफर नाकारल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे.