No Result
View All Result
- नुकतीच पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा अंतिम सामन्यापेक्षा देखील जास्त उपांत्य फेरीमुळे रंगली. माती विभागातील पै. सिंकदर शेख आणि पै. महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या सामन्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादग्रस्त ठरली. या सामन्यात पै. सिकंदरवर अन्याय झाल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली. या चर्चांना जातीय रंग देखील देण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. याच मुद्यावरुन कुस्तीसम्राट अशी ओळख असलेल्या पै. अस्लम काझी यांनी कान टोचले आहेत. सिंकदर बाबतीत घडलेला प्रकार हा तो मुसलमान आहे म्हणून नाही तर गडबडीत झाला. त्यामुळे या प्रकाराला जातीय रंग देऊ नका, असे मत कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी व्यक्त केले.
- “माती विभागातील अंतिम सामन्याबद्दल अनेकांचे मत आहे की या सामन्यात पक्षपातीपणा झाला. मात्र सुरुवातीपासून हा सामना अगदी पारदर्शकपणे सुरु होता. मात्र महेंद्रने बाहेरील डांग लावल्यानंतर एका बाजूने असे दिसले की सिकंदरवरुन आला आणि एका भूजावर पडला. त्यामुळे पंचानी चार गुण दिले. सिकंदरच्या कोचनी यासदर्भात हरकत घेतली. त्यावर निर्णय देताना ज्युरीनी गडबड केली असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांनी एकाच बाजूने बघून निर्णय घेतला. त्यांनी वेळ घेऊन चारही बाजूने तपासून निर्णय द्यायला हवा होता. त्यातच सिंकदरच्या कोचला आक्षेप घेताना ओढून नेतानाचा एक व्हिडीओ समोर आला त्यामुळे याला जास्त गालबोट लागले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंचांना मी याबाबतीत बोललो तर त्यांच देखील म्हणणे आहे की महेंद्रला या डावासाठी दोन गुण आणि सिंकदरला एक गुण मिळायला हवा होता. इथे दोन गुणाची पार्शलिटी झाली. मात्र ही पार्शलिटी सिकंदर मुसलमान आहे म्हणून किंवा त्याला प्लॅन करुन हरवण्यासाठी झालेली नाही. ही फक्त अनावधानाने किंवा गडबडीत झालेली चूक आहे. जाणीवपूर्वक पंचांनी हे केलं असं मला वाटत नाही,” असे मत कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी व्यक्त केले.
- “मी जवळपास 20 वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे. सिंकदर शेख प्रकरणात राजकारण सुरु आहे आणि त्याला जातीय रंग दिला जातोय असं दिसतंय. मात्र पैलवान हीच आमची जात असते. अस्लम काझी असो किंवा सिंकदर शेख याच्यावर केवळ कोणताही एक धर्म प्रेम करत नाही. सर्व जाती धर्माचे लोक आमच्यावर प्रेम करतात. आम्ही देखील दररोज बजरंग बलीच्या पाया पडतो किंवा त्याची सेवा करतो. बजरंगबलीचे नाव घेऊनच आम्ही आखाड्यात उतरत असतो. मला ज्याने तालीम बांधून दिली तो व्यक्ती मारवाडी समाजाचा आहे. मी मुसलमान आहे. आणि माझ्या तालमीचे नाव छत्रपती शिवराय कुस्ती संकुल आहे. कारण आमच्या इथे प्रत्येक जाती-धर्माचा माणूस असतो. कुस्ती हा खेळ हा कुठल्या एका जाती धर्माचा खेळ नाही. त्यामुळे इथल्या प्रकारांंना जातीय रंग देऊन नये,” असे मत कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी व्यक्त केले.
No Result
View All Result