१५ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे विद्यापीठात उदघाटन
सोलापूर : पर्यावरण हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जगाला भेडसावत आहे. विविध प्रकारच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बदलत्या तापमानाचा सर्वदूर परिमाण होताना दिसत आहे. समृध्द निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज घडविण्यासाठी पर्यावरण रक्षणातच आपले हित आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
१५ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे उदघाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात झाले. त्यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस बोलत होत्या. सकस अन्न, समृध्द निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज ही यंदाच्या फिल्म फेस्टिवलची थीम आहे. यावेळी मंचावर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस.के.पवार, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे प्लांट हेड एस.सी. घुमास्ते, फॅक्टरी मॅनेजर व्ही. यू. खरात, किर्लोस्कर वसुंधरा उपक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ.नरेंद्र काटिकर, किर्लोस्कर कंपनीचे एच.आर. मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. वसंत कोरे, मास कम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर उपस्थित होते. अमेरिकेतील पर्यावरण संशोधक संगीता तोडमल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, ग्रीन कॅम्पस म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ७०४ वा क्रमांक आहे. भारतात १२ वा क्रमांक आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे भान जोपासावे. आपल्या शैक्षणिक प्रकल्पात, अभ्यासक्रमात पर्यवणाला महत्व द्यावे. आपले जीवन महत्वाचे आहेच. सोबतच आपण पर्यावरणाच्या कक्षेत असलेल्या इतर सजीव, जीवजंतू यांचेही रक्षण करण्याची भूमिका घ्यावी.
सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे हे बोलताना म्हणाले की, न्युट्रिशन या थीमवर आधारित हा फिल्म फेस्टिवल आयोजिला आहे. हा विषय खूप महत्वाचा आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार पी. साईनाथ यांनीही नुकतेच या विषयाचे गांभीर्य सोलापूर दौऱ्यात मांडले आहे. सकस अन्न, समृध्द निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज घडविण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत. किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे प्लांट हेड एस.सी. घुमास्ते, फॅक्टरी मॅनेजर व्ही. यू. खरात, मास कम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनीही मनोगते व्यक्त केली.
फॅक्टरी मॅनेजर यु. व्ही. खरात म्हणाले की, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज यांचे परस्परावलंबी नाते लक्षणीय संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे अन्न आणि आरोग्य या विषयाचाही अभ्यास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. यावर्षी किर्लोस्कर वसुंधराच्या माध्यमातून समाजाचे आरोग्य, निसर्गाचे आरोग्य आणि आपल्या अन्नव्यवस्थेची स्थिती या तीन पैलूंना केंद्रस्थानी ठेवून विविध चित्रपटाद्वारे हा महोत्सव सादर होणार आहे.
प्लांट हेड एस.सी. घुमास्ते म्हणाले की, औद्योगिक प्रगती बरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आम्ही नेहमीच विविध क्षेत्रात काम करत असतो. या वर्षीची महोत्सव संकल्पना ” सकस अन्न , समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज , ही आहे. येणाऱ्या वर्षामध्ये या संकल्पनाद्वारे आमचा जनजागरणाचा मानस आहे. किर्लोस्करांचे सर्व उत्पादने सर्व कंपन्या व कर्मचारी हे पर्यावरण संदर्भात जागरूक आहेतच, हीच जागरूकता समाजामध्ये नेण्यासाठी सिनेमा हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. लघुपट, समूह चर्चा तसेच व्याख्यान या माध्यमांद्वारे आमचा या ४ दिवसाच्या महोत्सवाद्वारे लोकजागृतीचा प्रयत्न असणार आहे. प्रास्ताविक एच. आर. विभागाचे ऋषिकेश कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन कु. तेजस्विनी कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते .