येस न्युज मराठी नेटवर्क : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला शेवटचा अल्टिमेट आज संपतोय. आंदोलक कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू व्हावे असं आवाहन परब यांनी केलं होतं. एसटी कर्मचारी आज कामावर रुजू झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल. मात्र, कामावर रुजू न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परब यांनी दिला होता.
संपामुळे आतापर्यंत एसटीचे जवळपास साडेपाचशे कोटींचं नुकसान झालंय. महामंडळाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत साधारणपणे दहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. एसटीच्या एकूण 93 हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 20 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेत कामावर हजर राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीनुसार पगार मिळणार आहे. राज्यातील जवळपास 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार पगार करण्यात आला. तर संपकरी कर्मचाऱ्यांना मात्र पगाराला मुकावं लागणार आहे. संपकऱ्यांवर मेस्मा कारवाईला सामोरं जावं लागू शकतं, अशी सध्याची परिस्थिती आहे.