येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणाला कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी करोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली.
डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, “आपल्याला लागणारं रेमडेसिवीरचं इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास आज १२ हजार ते १५ हजार एवढं कमी मिळालेलं आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे.
तसेच, “नुकतीच माझी काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशाप्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? कारण साधरण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली होती. त्यावेळेस मला त्यांनी पुढील १५ तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता. त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्रात ५५ हजार रेमडेसिवीर पुरवतील अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंत कालच्या तारखेपर्यंत सरासरी जर आपण पाहिली, तर ३७ ते ३९ हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवलं आहे.” असंही डॉ.शिंगणे यांनी सांगितलं.