येस न्युज मराठी नेटवर्क : देशात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत गेल्या एका महिन्यात मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोनाचे नवीन रुग्ण अचानक कसे वाढले? याचं उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलं आहे. कोरोनावरील लस आली आहे. आता सर्व काही ठीक होईल, असं नागरिकांना वाटत आहे. नागरिकांना आता कोरोना संसर्गाचे गांभीर्य राहिलेले नाही. लोकांमधील कोरोनाबाबतचा निष्काळजीपणा वाढला आहे. ते सहजतेने घेत आहेत. यातूनच सुपर स्प्रेडरच्या घटना घडत आहे, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. दिल्लीत करोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
करोनावरील लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होणं ही दुर्मिळ घटना आहे. पण करोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव होत असेल तर जीवाला असलेला धोका कमी असतो. सर्व पस्थितीत कोरोनाचा सामना करण्याची प्रक्रीया आता निश्चित झाली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने मंजुरी दिलेल्या दोन्ही लसी( कोविशिल्ड, कोवॅक्सिन ) सुरक्षित आणि प्रभावी आहेत. या लसींचे डोस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. तरीही अनेकांना या लसींवर संशय आहे. व्हॉट्सअॅपवरून फॉरवर्ड झालेल्या कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका, लसीकरणासाठी पुढे या, असं आवाहन हर्षवर्धन यांनी नागरिकांना केलंय.