येस न्युज मराठी नेटवर्क । राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट वाढत चाललं असताना दुसरीकडे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. काल विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यातील अन्य काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. आज देखील राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काल सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचं खूप नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यासह अमरावती शहरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. काल दुपारी विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला.
पुण्याच्या मावळ तालुक्यात ही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. मावळ तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जातो. त्यात काल सुट्टीचा दिवस असल्याने या गारपिटीचा पर्यटकांनी आनंद घेतला. गेली अनेक दिवस नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत, या गारपिटीने मात्र ते सुखावले आहेत. यामुळं शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे.