सोलापूर – आजच्या लेखकांना, आजच्या लिहिणाऱ्यांना संयम नाही. लगेच मोठं व्हायचंय. लाईक्स आणि कमेंट्सवर जगणाऱ्या पिढीला मेंटॉर कसे मिळणार. जखमा संपल्या की निर्मिती संपली.. खडबडीत पाट्यावरच चांगलं वाटलं जातं. कलेच्या क्षेत्रात शिखर नसतंच.. सतत ती अस्वस्थता असली पाहिजेत. जखमा, दुःख आपल्या वाट्याला आली नसली तरी ती दत्तक घेता आली पाहिजे. असे प्रतिपादन प्राध्यापक, कवी, गीतकार व संवेदनशील लेखक प्रा. प्रविण दवणे यांनी केले. प्रिसिजन वाचन अभियानात प्रा. दवणे बोलत होते. चिरंजीव व कवी आदित्य दवणे यांनी प्रा. दवणे यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रारंभी प्रिसिजन फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी दवणे पितापुत्रांचे स्वागत केले.
प्रिसिजन वाचन अभियानात पहिल्यांदाच लेखक, कवी असलेल्या पुत्राने साहित्यिक व गीतकार असलेल्या आपल्या पित्याची मुलाखत घेतली. या पुतापुत्रातील संवादाने त्यांच्यातील साहित्यिक व कौटुंबिक बंध उलगडत गेले.
आजवर आपण अनेक संगितकारांकडे गीतलेखन केलं कोणता संगीतकार अधिक भावला, या आदित्यच्या प्रश्नावर दिलखुलास बोलताना प्रा. दवणे म्हणाले की, इंद्रधनुष्यातल्या कोणत्या रंगामुळे इंद्रधनुष्य खुलून दिसतं या प्रश्नासारखा हा प्रश्न आहे.. अजय-अतुलची चाल धबधब्यासारखं असते.. अनिल मोहिले म्हणजे प्रचंड मेहनत.. अशोक पत्कींची तरलता मला भावली. मनातली कविता पत्कींबरोबर लिहिता आली. खळ्यांच्या संगीतात जादू अशी की, तिथे गीतकाराचे शब्दांना छान जोजवले जाते. नंदू होनप यांच्यामुळे “निघालो घेऊन दत्ताची पालखी..” “अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली” यासारखी गीतं लिहू शकलो. पण टप्पोरं गाणं लिहिण्याचा खरा आनंद श्रीधर फडकेंकडे मिळाला.. कोरोना काळात तरी मी अडीचशेहून अधिक गीतं लिहिली.
गाण्यामध्ये कसं काव्य जपता यावर ते म्हणाले की, गाण्यामध्ये काव्य कसं जपता यापेक्षा कवितेने मला कसे जपले हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आरती प्रभू, ग्रेस यासारख्या कवींच्या उत्तम कविता संगीतकारांनी वेचल्या त्याची गाणी बनवली. माझ्यासारख्या गीतकारांना ते आव्हान असतं. काव्य आणि लोकप्रियता यांचा संगम म्हणजे उत्तम गाणं हे माझ्यासाठी साधं सूत्र आहे, असे प्रा. प्रविण दवणे यांनी सांगितले.
नव्याने लिहिणाऱ्या कवींना आज कुणी मार्गदर्शक नाही. मेंटॉर नाही.. साहित्यिकदृष्ट्या आमची पिढी अनाथ आहे…अशा परिस्थितीत त्यांनी काय करावं? या प्रश्नावर दवणे म्हणाले, “माणूसपणाची उत्कटता अनुभवता येईल अशी साहित्यिकांची पिढी आम्हाला मिळाली. राजकीय विखार आणि मूल्याचं अधःपतन इतकं झालंय की आज जमीनही लाजेल. सगळ्याच पातळीवर होणारं अधःपतन चिंताजनक आहे. त्यामुळे हे वैचारिक अनाथपण आलं. आज जगण्यातली, सृजनातली नैष्ठिकताच उरली नाही. आजच्या लिहिणाऱ्यांना संयम नाही. लगेच मोठं व्हायचंय. तुमची आतून आलेली कविता बाहेरून पुरस्कार मिळवणारी नसेल कदाचित पण ती जेंव्हा शब्दांतून व्यक्त होते तेंव्हा तोच पुरस्कार असतो.”
आयुष्यात आजवर भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तीमत्वांनी कसं प्रभावित केलं हेही त्यांनी सांगितलं. आई आणि वडिलांच्या स्वभावाचा, प्रोत्साहनाचा खूप मोठा परिणाम आपल्या घडण्यावर झाला असल्याचे प्रा. दवणे यांनी सांगितले.
प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी नितीन फलटणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले. सोलापुरातील वाचक, रसिक आणि साहित्यिकांची कार्यक्रमाला गर्दी केली होती.










