महाराष्ट्रात पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे ३३६ कोटींचे दावे प्रलंबित

0
33

येस न्युज नेटवर्क : पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे 2021-22 मधील 2,761.10 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत दिली. राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याला मिळणारे पीक विम्याचे पैसे सर्वाधिक प्रलंबित आहेत. या तीन राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप अडीच हजार कोटी रुपयांची भरपाई मिळालेली नाही, त्यात महाराष्ट्रातील 336 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत लेखी उत्तरात पीक विम्यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील काही शेतकऱ्यांचे (पंतप्रधान पीकविमा योजनेचे) पीक विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांला नरेंद्रसिंह तोमर यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्राची भरपाई 336 कोटी रुपये आहे. सर्वाधिक थकित भरपाई रक्कम राजस्थानची तेराशे कोटी इतकी आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत दावे सामान्यतः संबंधित विमा कंपन्यांद्वारे काढणीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत आणि पेरणी रोखण्यासाठी, मध्य हंगामातील प्रतिकूलता आणि कापणीनंतरच्या नुकसानीच्या जोखमीसाठी अधिसूचनेच्या एक महिन्याच्या आत अदा केले जातात. त्याशिवाय प्रिमियम सबसिडीचा एकूण हिस्सा वेळेत मिळतो. काही राज्यांमध्ये दाव्यांचा निपटारा होण्यास उशीर झाला, कारण उत्पन्नाची माहिती विलंबित प्रसारित झाली, असे तोमर यांनी सांगितले.