सोलापूर – राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार जागांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे. २६ जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
अंगणवाडी सेविका होण्यासाठी पूर्वीपासून दहावी उत्तीर्ण अशी अट होती. परंतु, अंगणवाड्यांमधील ७५ लाख विद्यार्थ्यांची दररोज ‘पोषण ट्रॅकर’ ॲपद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे.
जानेवारीअखेरीस भरतीची प्रक्रिया सुरु होईल. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी, त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागविण्यासाठी किमान २० ते २५ दिवस लागणार आहेत. त्यानंतर विधवा, जातसंवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता, यावरून संबंधित पात्र उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे.