महापालिका सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समिती आणि नगरसेवकांचा कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळे सोलापूर महापालिका प्रशासनाने गेल्या पाच वर्षात सुसाट वेगाने विकासाची कामे करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय कालावधीत उल्लेखनीय काम झाल्याचे फारसे दिसत नाही. गेल्या पाच वर्षात प्रशासनाला 54 मीटर रस्त्याचा विषय सोडविता आला नाही . तब्बल 18 कोटी रुपये खर्चून महापालिकेने रेल्वे कडून अवंती नगर या ठिकाणी रेल्वे अंडर ब्रिज बांधला . हे काम होऊन तीन वर्षे झाले तरीही महापालिका या ब्रिजच्या खाली अप्रोच रोड करू शकली नाही . तसेच रेल्वे ट्रॅकच्या पलीकडील 16 झोपड्या काढून आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला या ठिकाणी देखील महापालिकेने अवघे 300 मीटरचे काम देखील केले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौक अवंती नगर ते सीएनएस हॉस्पिटल पर्यंत 54 मीटर रस्त्याचा चांगला पर्याय सोलापूरकरांना अद्याप मिळू शकला नाही . अण्णाभाऊ साठे चौक ते मरिआई चौक यादरम्यान असलेला आणि शंभर वर्ष जुना झालेला रेल्वेचा ब्रिज नोव्हेंबर अखेर पाडणार असल्याचे रेल्वेचे वरिष्ठ मंडल प्रबंधक योगेश पाटील यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेने पर्यायी रस्ता करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सुमारे 2 लाख लोकांना अवघा एक किलोमीटर ये – जा करण्यासाठी सात ते आठ किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागणार आहे. रेल्वेचा ब्रिज पाडल्यानंतर प्रचंड मोठी गैरसोय होणार आहे अजूनही महापालिकेला याचे गांभीर्य नाही हे दुर्दैव.

