१९८३च्या वर्ल्डकप विजयात मोलाचे योगदान देणारे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशपाल हे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचे मोठे चाहते होते. जेव्हा ते संघासमवेत हॉटेलमध्ये असायचे, तेव्हा ते दिलीप कुमार यांचा ‘क्रांती’ चित्रपट बघायचे. मात्र, त्यांचे ‘क्रांती’ चित्रपटाचे वेड पाहून इतर खेळाडू अस्वस्थ व्हायचे.त्यामुळे संघातील इतर खेळाडू कोणत्या तरी कारणाने यशपाल यांना बाहेर पाठवायचे, जेणेकरून ते टीव्हीवर दुसरे काहीतरी पाहू शकतील. पण हाच खेळ त्यांच्या अंगउलट आला. यशपाल यांना क्रांती चित्रपटाचे इतके वेड होते, की त्यांनी एकदा टीव्हीच उचलून घेऊन गेला होता. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी हा किस्सा ‘द कपिल शर्मा शो’च्या या कार्यक्रमात सांगितला होता.या कार्यक्रमात संदीप पाटील म्हणाले, ”आम्ही १९८३मध्ये वर्ल्डकप खेळत होतो, तेव्हा एक क्रांती घडली. क्रांती चित्रपट त्यावेळी रिलीज झाला होता. सकाळ, दुपारी, संध्याकाळ क्रांती-क्रांती-क्रांती चित्रपट पाहिला जात होता. यशपाल शर्मा क्रांती घेऊन बसले. बलविंदर संधू यांनी एक आयडिया केली. त्यांनी यशपालला कोणाचा तरी फोन आला आहे, असे सांगून बाहेर पाठवले. योजनेनुसार मी कॉल केला आणि यशपाल कॉल घ्यायला गेला. तोपर्यंत क्रांतीची टेप बाहेर काढली आणि दुसरा चित्रपट लावला गेला. यशपाल दोन मिनिटांत परत आला आणि दुसरा चित्रपट पाहून त्याला धक्काच बसला. मग रागाच्या भरात त्याने टीव्ही उचलला आणि तो घेऊन गेला.”









