सोलापूर-आसरा चौकातील बालाजी सरोवर हॉटेल येथे जनस्वराज पार्टीचे संस्थापक तथा लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते,आमदार विनय कोरे यांच्याकडे 200 बेड्स शासकीय महिला व शिशु रुग्णालयचे वीर राणी कित्तूर चेन्नमा महिला व शिशु हॉस्पिटल असे नामकरण करण्यात यावे याचे निवेदन जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिले.
याप्रसंगी कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री एम बी पाटील,श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी, जनसुराज पार्टीचे राज्य कोरकमिटीचे रवी कोरे व शहराध्यक्ष वीरेश सक्करगी, कोनापुरे, लिंगायत समन्वय समितीचे शहराध्यक्ष सकलेश बाबुळगावकर, राष्ट्रीय लिंगायत महामंच जिल्हाध्यक्ष नामदेव फुलारी, शहराध्यक्ष सिद्धाराम कटारे उपस्थित होते.
सोलापूरमध्ये शासकीय रुग्णालयांची कमतरता भासत असल्यामुळे सन २००९ साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर शासकीय रुग्णालयांचा विस्तार करून क्षमता वाढविणे व नवीन रुग्णालये मंजूर करून आणण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे व आमदार विजयकुमार देशमुख या प्रयत्नशिल होत्या. तत्कालीन राज्य शासनाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यामध्ये सोलापूरकरीता गुरुनानक चौक येथील १०० खाटांचे सिव्हिल हॉस्पिटल व १०० खाटांचे महिला आणि शिशु रुग्णालय मंजूर करून घेतले होते.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी पहिली महिला क्रांतीकारक वीरराणी कित्तूर चेन्नम्मा यांचा २३ ऑक्टोबर १८२४ च्या लढाईत संस्थान खालसा करणारा, धारवाडचा तेव्हाचा कलेक्टर थेंकरे, चेन्नम्माच्या सैन्याने मारला. ३ डिसेंबर १८२४ रोजी चेन्नम्माला पकडली गेली. कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले. युद्धबंदी बनवून चेन्नम्माला बैलहोनंगळच्या किल्ल्यात पाठवलं आणि तिथेच तिचा २१ फेब्रुवारी १८२९ साली मृत्यू झाला. कित्तूर संस्थान खालसा केलं. यावेळी इंग्रजांनी किल्ल्यांमध्ये जी लूट केली त्यामध्ये १६ लाख रुपये रोख व ४ लाखांचे जवाहीर, घोडे, उंट, हत्ती यांसह ३६ तोफा, बंदुका, तलवारी आणि प्रचंड दारूगोळा असा बराचसा माल होता.


राणी चेन्नम्माच्या निधनानंतर १८२९ मध्ये सेनापती संगोळी रायन्ना यांनी देसाई च्या दत्तक मुलास पुढे करुन इंग्रजांपुढे आव्हान उभे केले. ब्रिटिशांना सळोके पळो करून टाकले. बेळगावपासून ५० किमी अंतरावर कित्तूरचा किल्ला आजही चेन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या जनतेच्या हक्कासाठी ब्रिटीशांसोबत दोन हात केलेल्या चेन्नम्माच्या शौर्याच्या खुणा भारतीय अंगावर अभिमानाने मिरवत आहे. चेन्नम्माच्या कार्याची दखल घेत ११ सप्टेंबर २००७ रोजी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संसदभवनच्या प्रांगणात राणी चेन्नम्मा यांच्या दिमाखदार पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. राणी चेन्नम्मा या पहिल्या स्त्री क्रांतिकारकाच्या शौर्यगाथेस प्रणाम अशा या वीरांगणाचे नाव सोलापूर येथील 200 बेड्स हॉस्पिटलचे वीरराणी कित्तूर चन्नम्मा महिला व शिशु रुग्णालय व सिव्हील हॉस्पिटल असे नामकरण करण्यात यावे, अशी लोकभावना आहे. याप्रसंगी आमदार विनय कोरे म्हणाले या विषयाबाबत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करून मान्य करून घेऊ असे अभिवचन शिष्टमंडळास दिले










