सोलापूर : जिल्ह्यात सध्या पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे शेतीसाठी उजनी धरणातून उजवा व डावा कालव्यातून रविवारपासून पाणी सोडण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे उजनी धरणाच्या डावा व उजवा कालव्यावर अवलंबून असणाऱ्या लाखों एकर क्षेत्रातील खरीप पिके व फळबागा पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नुकतेच उजनी धरण उणे 9 टक्क्यावरून उपयुक्त पातळीत आले असून सध्या उजनी धरणातील पाण्याची पातळी 494.990 मीटर असून एकूण साठा 2748.78 दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणी साठा 945.97 दशलक्ष घनमीटर आहे. सध्या धरणात 62 टक्के पाणीसाठा आहे. या सर्व अनुकूल परिस्थितीमुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.उजनी धरणात भविष्यकाळात पाणी येण्यासाठी अद्याप दीड ते दोन महिन्याचा पावसाळा बाकी आहे. त्यामुळे उजवा व डावा कालव्यातून शेतीला पाणी तातडीने देण्यात यावे, अन्यथा लाखो एकर क्षेत्रातील ऊस, फळबागा, खरीप पिके व चाऱ्याची उभी पिके पाण्याअभावी जळून जाऊन शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होईल. तसेच पिण्यासाठी व विविध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित राहण्याच्या दृष्टीने देखील पाण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.
उजनी धरणाची शनिवारी सकाळी आठ वाजताची स्थिती पाणी पातळी
- पाणी पातळी : 494.985 मीटर
- एकूण साठा : 2747.35 दशलक्ष घनमीटर
- उपयुक्त साठा : 944.54 दशलक्ष घनमीटर
- टक्केवारी : + 62.26 टक्के
- बंडगार्डन विसर्ग : 2551 क्युसेक्स
- दौंड विसर्ग : 2717 क्युसेक्स
- भीमा सीना जोड कालवा (बोगदा) सीनानदीमध्ये : 150 क्युसेक्स