सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायतीची निवडणूक ६३ वर्षांनंतर बिनविरोध पार पडलेली आहे. या बिनविरोध सदस्यांचा सत्कार मा. आ. सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नूतन सदस्य श्रीमंत बंडगर यांनी या ग्रामपंचायतीने आता गावासमोरच्या १०० समस्या सोडविण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.
आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, वृक्ष लागवड, शेत रस्ते, जलसंधारण, कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, रोजगार आणि महिला सशक्तीकरण इत्यादी विषयांशी संबंधित असलेल्या १०० समस्यांची यादीच श्री. बंडगर यांनी मा. सुभाष देशमुख यांना सादर केली. या समस्या सोडविणे पूर्णपणे लोकसहभागावर अवलंबून असल्यामुळे लोकांनी सहकार्य करावे असेही आवाहन श्री. बंडगर यांनी केले. यावेळी बिनविरोध निवडून आलेले सदस्य सर्वश्री आनंद बंडगर, उमेश पाटील, पंकज मसलखांब, सुनीता वाघमोडे, सोनाली गायकवाड, राजश्री माने, सुवर्णा वाघमोडे, लक्ष्मी मळगे यांचा सुभाष देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा बांधून आणि श्रीमंती सोलापूरची हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात तिर्हे गावचे नूतन ग्रामपंचायत सदस्य विशाल जाधव, महेश पवार, नारायण गायकवाड आणि समाधान गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सुभाष देशमुख यांनी ६३ वर्षानंतर का होईना परंतु या गावच्या जनतेला बिनविरोध निवडीचे महत्त्व लक्षात आले याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. १०० समस्यांचा मार्मिकपणे उल्लेख करताना मा. सुभाषबापूंनी, या १०० समस्या का निर्माण झाल्या याचा विचार आधी करावा तरच त्या सोडविण्याचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.
गावच्या जनतेमध्ये एकमत नसणे आणि निष्कारण राजकारण करून भांडत बसणे यामुळे या समस्या निर्माण झालेल्या आहेत असे सांगतानाच मा. सुभाषबापूंनी, तुम्ही निवडणूक बिनविरोध केली इथेच तुमच्या समस्या सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे प्रतिपादन केले.
गावची सुधारणा बाहेरचा कोणी येऊन करणार नाही. आपल्याला स्वतःलाच ते करावे लागणार आहे, असे सांगतानाच मा. बापूंनी या समस्या सोडविण्याचे विविध मार्ग गावकर्यांना सांगितले. शासकीय योजनांच्या माध्यमातून या समस्या सोडविता येतीलच परंतु काही दानशूर लोकांची मदत घेऊनसुध्दा आपण यातल्या काही समस्या सोडवू शकतो असे ते म्हणाले. मात्र असे करतानाच स्वतःच्या प्रयत्नातूनसुध्दा कृषी पर्यटनासारखा उद्योग करून रोजगार निर्मिती करू शकतो असे ते म्हणाले. गावच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि गावात तयार होणार्या उत्पादनांना मार्केट मिळविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी असेही मार्गदर्शन त्यांनी केले.
या गावच्या समस्या सोडवून त्याला आदर्श गाव बनवून देशाच्या नकाशावर आणण्यासाठी गावकरी झटणार असतील तर त्यांना सोलापूर सोशल फाऊंडेशन आणि लोकमंगल सहकारी बँक यांच्याकडून भरघोस सहाय्य केले जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.
नव्याने निवडून आलेल्या बिनविरोध सदस्यांनी असे काम करून दाखवावे की त्यांचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर लोकांच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजेत, असेही उद्गार सुभाषबापू यांनी काढले.
या कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, बलवंतमहाराज कोले, प्रभाकर माने, फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील, तिर्हेचे रामकाका जाधव, दत्तात्रय गणेशकर, औदुंबर बंडगर, चंद्रकांत मसलखांब, म्हाळाप्पा बंडगर, महादेव जाधव, श्रीकांत बंडगर, प्रकाश मळगे, सुशिलसिंह बायस, समाधान बंडगर, काशिनाथ माने, आण्णा गायकवाड, विष्णु बंडगर, अर्जुन गायकवाड, बाबु सुरवसे, उत्तम मसलखांब, सारंग बंडगर, पिंटु मळगे, रवि गायकवाड, बबलु मारकड, चंद्रकांत मारकड, श्रीधर बंडगर, कुंडलिक वाघमोडे, नागनाथ गावडे, बाबा लवटे, बालाजी कोले, प्रकाश घोडके, साताप्पा मसलखांब, आण्णा जाधव, कासीम शेख, पोलिस पाटील नागेश बंडगर, ग्रामसेवक सरवदे व ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन संजय वाघमोडे व आभार प्रदर्शन उमेश पाटील यांनी केले.