येस न्युज मराठी नेटवर्क : विदर्भातील वाशिम जिल्ह्यात बुधवार सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. मंगरुळपीर, मानोरा तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळं अरुणावती नदी पूर आला आहे. पूस नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराच्या पाण्यामुळं नदीकाठची शेती पूर्णपणे खरडून गेली असून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा इथं नदीचं पाणी शेतात शिरल्यानं उभ्या पिकासह शेती खरडून गेली आहे. सावरगाव येथील अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. संपूर्ण सोयाबीन पीक पाण्यात गेलं आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तलावाचं स्वरूप आलं आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वटफळ आणि कुंभी गावाशेजारी असलेल्या पाझर तलावाला मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळं पाझर तलावाखाली असलेली शेती खरडून गेली आहे. या तलावातील पाणी पूस नदीमध्ये जात असल्यानं कोणत्याही गावाला याचा फटका बसला नाही. मात्र, शेतीचं नुकसान झालं आहे.