सोलापूर शहरातील ट्रॅफिक जॅम ची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अरुंद रस्ते..रस्त्याच्या कडेला होणारी अतिक्रमणे आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली वाहने यामुळे विविध ठिकाणी आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यातच दमानी नगर येथील जुना रेल्वे ब्रिज पाडल्यामुळे आणि आज पासून महिला हॉस्पिटल पासून पुढे विमानतळाकडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येत असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. दमानी नगर येथील रेल्वे ब्रिज पाडून जवळपास सात महिन्यांचा कालावधी उलटला. आणि दमानी नगर कडे जाण्यासाठी सुचवण्यात आलेले तीनही मार्ग गैरसोयीच्या आहेत. मोदी स्मशानभूमी रामवाडी मार्गे वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. जुनी पोलीस लाईन ते शेटे वस्ती बोगदा या ठिकाणी देखील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे मात्र हा रस्ता खराब झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंती नगर कडे जाणाऱ्या 54 मीटर रस्त्यावरून वाहने सुसाट जात असली तरीही अवंती नगर येथील रेल्वे पुलाखालचा एक भाग अर्धवट असून हा भाग धोकादायक बनला आहे. शिवाय आज पासून होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत सुमारे चार किलोमीटर लांबीचा रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. एकूणच सोलापूरकरांना विविध रस्त्यावर वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.











