येस न्युज मराठी नेटवर्क : गेले वर्षभर करोना काळात देशाचा विकासदर जवळपास उणे असताना, गरीब व मध्यवर्गीयांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालेले असताना सामान्यांच्या आयुष्याला आधार वाटेल असा अर्थसंकल्प सादर करणे अपेक्षित होते. मात्र, या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, कष्टकरी, मजूर, हमाल व मध्यमवर्गीय यांच्यासाठी ठोस असे काहीही नाही. उलट देशासाठीच्या या सर्वात वाईट काळातील हा सर्वात वाईट अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केले. हा अर्थसंकल्प म्हणजे फुगा असून टाचणी लागली की तो फुगा फुटणार. करोना काळात जाहीर केलेले दहा लाख कोटींचे पॅकेज कुठे गेले हे जसे कोणालाच कळले नाही तसेच या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या रकमा कुठे गेल्या हेही कोणालाच कळणार नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. हा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांसाठी आहे असे वाटत नसून काही विशिष्ट उद्योगपतींसाठी हा अर्थसंकल्प आहे, यात शंका नाही, असा थेट हल्ला जयंत पाटील यांनी सरकारवर केला.