येस न्युज मराठी नेटवर्क : कोकणात विविध भागात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण शहरात सर्वाधिक हाहा:कार पाहायला मिळत आहे. बाजारपेठ, अनेक घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. अशावेळी नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्र सरकार हेलिकॉप्टरसह सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर राणे यांनी राज्य सरकार पूरस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचं म्हटलंय. राज्याला ड्रायव्हर नको तर लोकांचं हित पाहणारा चांगला मुख्यमंत्री हवा आहे, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
जवळपास 350 मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे. हेलिकॉप्टर, बोटीने लोकांना काढणं, अन्न पुरवठा करणं, त्यांना सुरक्षितस्थळी नेणं हे काम सरकारनं केलं पाहिजे. मी केंद्रीय मंत्री नित्यानंतर रॉय यांच्याशी बोललो आहे. त्यांनी आश्वासन दिलं आहे की मी सगळी व्यवस्था करतो. गरज भासल्यास आपण अमित शाह यांच्याशीही बोलणार असल्याचं राणे म्हणाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची माहिती राणे यांनी दिलीय.

