सोलापूर : राज्यात बेरोजगारी वाढल्याने विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाऐवजी रोजगारक्षम शिक्षणाला पसंती दिली आहे. दहावी-बारावीच्या गुणांची यंदा टक्केवारी वाढणार असल्याने आठ दिवसांत तब्बल 23 हजार विद्यार्थ्यांनी डिप्लोमा आणि डी-फार्मसीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत 23 जुलैपर्यंत दहावीचा तर 2 ऑगस्टपूर्वी बारावीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती पुणे बोर्डाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दहावी-बारावीतील साडेसोळा लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रवेश प्रक्रियेला विलंब लागू नये, या हेतूने तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांकाचा आधार घेत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात डिप्लोमा इन इंजिनिअरिंगच्या एक लाख पाच हजार तर पदविका औषध निर्माणशास्त्रच्या (डी- फार्मसी) 25 हजार जागा आहेत. गुणांची टक्केवारी अन् व्यावसायिक अभ्यासक्रमाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने अनेक विद्यार्थी विशेषतः ग्रामीण भागातील मुले दहावी- बारावीनंतर पारंपरिक शिक्षण घेतात. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी “स्कूल कनेक्ट’ नावाचा उपक्रम राबविला. त्यामुळे राज्यातील चित्र बदलत असून आता तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.











