आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. दोन वर्षे करोनाच्या संकटानंतर मागील वर्षापासून पंढरपूर येथे आषाढी एकादशीची वारी नियमित सुरू झाली. यंदा या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे ५ हजार विशेष बस चालवण्यात येत आहेत.
२५ जून ते ०५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी मंगळवारी २०० अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून बसचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त राज्यातून पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी आणि भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. औरंगाबाद प्रदेशातून १,२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १,२००, नाशिक १ हजार आणि अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष बसचे नियोजन केले आहे.