समुपदेशनाद्वारे पारदर्शक पद्धतीने नियुक्त्या; स्वच्छता, ग्रामविकास व लोकाभिमुख सेवांना गती देण्याचे आवाहन
सोलापूर : जिल्ह्यातील ३३२ नूतन शिक्षकांना समुपदेशनाद्वारे जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेने ‘सेवा संकल्प अभियानाची’ सुरुवात केली. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील पांडुरंग ज्ञानेश्वर शिंदे व आदिती चव्हाण यांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध लोकाभिमुख उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आदी उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे अध्यक्ष दीपक वैद्य यांचे आवाहन
जिल्ह्यातील बीबीदारफळ व मार्डी या ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या सहभागातून दर रविवारी गावात स्वच्छता मोहीम राबवून आदर्श निर्माण केला आहे. नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासोबतच ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. सेवा संकल्प अभियान केवळ एका महिन्यापुरते मर्यादित न ठेवता त्यानंतरही विविध उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाचे चांगले नियोजन करण्यात आले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवाभावाने काम करण्याचा संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले.
‘एक दिवस स्वच्छतेसाठी द्या’ – उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सेवा संकल्प अभियानासोबतच २ ऑक्टोबर रोजी आयोजित स्वच्छता महाश्रमदानात नागरिकांनी सहभागी व्हावे. बीबीदारफळ येथे सलग ४९ व्या रविवारी स्वच्छता उपक्रम राबविला जात आहे. मार्डी ग्रामपंचायतीने या उपक्रमाची सुरुवात केली असून, अकोलेकाटी व बीबीदारफळ ग्रामस्थही स्वच्छतेच्या कामात पुढाकार घेत आहेत. प्रत्येकाने किमान एक दिवस स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले.
ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – सीईओ कुशल जैन
सेवा संकल्प अभियानाच्या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील विविध घटकांची चार सप्ताहांत प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
स्वच्छता ही सेवा २०२६ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, प्लास्टिक निर्मूलन, जलसंधारण आदी उपक्रमांना गती द्यावी. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चार सप्ताहांत विशेष उपक्रम राबवून नागरिकांना लोकाभिमुख सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.
शिक्षण विभागाच्या माध्यमातून ३३२ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे जागेवर नियुक्ती आदेश देत सेवा संकल्प अभियानाची सुरुवात करण्यात आली, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्यात आले असल्याचेही सीईओ कुशल जैन यांनी नमूद केले.
शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभियानाची प्रभावी सुरुवात – सभापती चेतनसिंह केदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेच्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने सेवा संकल्प अभियानाची प्रभावी सुरुवात केली आहे. त्यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत शिक्षण विभागाने ३३२ शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, ही समाधानाची बाब आहे.
मार्डी व बीबीदारफळ ग्रामपंचायतींनी स्वच्छतेच्या क्षेत्रात निर्माण केलेला आदर्श जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही घ्यावा, असे आवाहन सभापती चेतनसिंह केदार यांनी केले.
विविध विभागांच्या उपक्रमांचे नियोजन
प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. शिक्षण विभागाच्या माध्यमातून ३३२ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू असून, शिक्षणाधिकारी विशाल मुळे व त्यांच्या पथकाकडून पारदर्शक पद्धतीने समुपदेशन घेऊन नियुक्त्या देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी समाजकल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागाच्या उपक्रमांचे नियोजन सांगितले. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, जिल्हा कृषी अधिकारी हरिदास हावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपेरवाड यांनी आपापल्या विभागांतर्गत सेवा संकल्प अभियानातील उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी आभार मानले












