तुळजापूर – सध्या राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून अनेक गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने धाराशिव जिल्हयातील परांडा तालुक्यामधील पूरग्रस्त भागातील महिलांसाठी एक हजार साड्यांचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय अजूनही मंदिर संस्थानच्या वतीने विविध प्रकारचे मदतकार्य सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक ती मदत वैळोवेळी पुरविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान है भाविकांनी दिलेल्या देणगीवर चालते. भाविक आणि मंदिर संस्थान यांचे अतूट नाते आहे. हाच धागा जपत संस्थान नेहमीच सामाजिक बांधिलकी पार पाडत आले आहे. राज्यात कुठेही नैसर्गिक आपती उद्भवल्यास मंदिर संस्थान आपतीग्रस्तांच्या मदतीला धावून येते. याआधीही कोल्हापूर परिसरातील महापुराच्या काळात मंदिर संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले होते. पुण्यातील महापुरावेळीही मंदिर संस्थानने मदतकार्य केले होते. तसेच २०१९ मध्ये पूरग्रस्तांसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांची दिली होती. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, अतिवृष्टी मुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत. परांची पडझड झालेली आहे. पिकांचे नुकसान झालेले आहे. जनावरे वाहून गेलेली आहेत. अशा गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्कात राहून मदतकार्य करण्याचे नियोजन करत आहे.
भाविकांप्रती आणि समाजाप्रती असलेली ही बांधिलकी कायम ठेवत आजही तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पूरग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. देवीच्या भक्तांशी असलेले भावनिक नाते जपत मंदिर संस्थान नेहमीच संकटाच्या काळात समाजासाठी तत्पर राहिले आहे. आजही तेच धागे पुन्हा घट्ट विणले जात आहेत. पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान त्यांना आधार देत आहे. समाजाप्रती असलेली ही निरंतर बांधिलकी आणि देवीच्या भक्तांशी असलेले भावनिक नाते मंदिर संस्थान नेहमीच जपत आले आहे आणि पुढेही जपत राहील.

