सोलापूर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पावन पर्वावर समाजसेवेचा हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने शहरातील एका गरीब कुटुंब तील मयुरी मेरगु याच्या विवाहप्रसंगी लग्नानिमित्त भांडे धान्य वाटप अनाथ मुलांना गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. सणाच्या आनंदात सहभागी होताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य हा खऱ्या अर्थाने शिवजन्मोत्सवाचा आनंद ठरला.






तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिठाईचे वितरण करण्यात आले. अनेक जण आपल्या प्रियजनांच्या उपचारासाठी दिवस-रात्र रुग्णालयात थांबलेले असतात. अशा वेळी सणाच्या दिवशी मिळालेला गोड प्रसाद त्यांच्या मनाला दिलासा देणारा ठरला.याच सेवाकार्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली. बेघर अवस्थेत जगणारे वृद्ध आजोबा नारायणदास भूतडा यांना आस्था रोटी बँकेकडून नियमित अन्न दिले जात होते. मात्र त्यांची खालावलेली प्रकृती, असुरक्षित परिस्थिती आणि एकाकी जीवन पाहून संस्थेचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांच्या मनाला अक्षरशः पाझर फुटला.“केवळ अन्न देणे नव्हे, तर सन्मानाने जगण्याची संधी देणे हीच खरी सेवा,” या भावनेतून त्यांना आस्था वृद्धाश्रम येथे कायमस्वरूपी सुरक्षित आसरा देण्यात आला. आता त्यांना केवळ अन्नच नव्हे, तर निवारा, वैद्यकीय काळजी आणि आपुलकीची साथ मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त प्रथम महाराजांच्या प्रतिमेस पूजा करण्यात आली त्यावेळी नगरसेवक गीता गवई व नगरसेवक बबीता अनंतकुमार धुम्मा तसेच सामाजिक कार्यकर्ते अनंतकुमार धुमा व रामराव रहाणे व सुलभा राहणे लक्ष्मीकांत भूमकर हे सर्वजण कार्यक्रमास उपस्थित होते त्यानंतर प्रमुख पाहुणेच्या हस्ते विवाह साहित्य व धान्य वाटप करण्यात आले व नंतर आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँकेचे वेबसाईट ओपनिंग करण्यात आले आहे
हा उपक्रम केवळ सणापुरता मर्यादित न राहता समाजासाठी एक आदर्श ठरला. शिवजन्मोत्सव म्हणजे स्वराज्याची प्रेरणा, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद आणि दुर्बलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शिकवण. त्याच विचारांचा प्रत्यय या सेवाकार्यातून आला.या उपक्रमात स्नेहा वनकुद्रे, अनिता तालीकोटी, पुष्कर पुकाळे, संगीता छंचुरे, अविनाश मार्चला, सुरेखा पाटील, प्रकाश डोंगरे विजय छंचुरे तसेच वैशाली काळे, वनश्री कंदले, शशिकला पांढरे, अर्चना कटमले आदी स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने सहभाग घेतला.
संस्थेच्या वतीने समाजाला संदेश देण्यात आला की,
“शिवरायांचा खरा वारसा म्हणजे दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांच्या डोळ्यांत आनंद निर्माण करणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे.”
शिवजन्मोत्सवाच्या या पावन दिवशी सेवाभावातून साकारलेली मानवतेची हीच खरी शिवभक्ती ठरली.











