सुलतानपूर येथे अडकलेल्या नागरिकांसाठी आर्मी मार्फत फूड पॉकेट पोहोचवण्यात येत आहेत.
काल दारफळ येथे आर्मी मार्फत 8 लोकांचे एअरलिफ्टिंग झालेले होते, आज उर्वरित 20 लोकांसाठी पुन्हा सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू…
सोलापूर – माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वाकाव व मुंगशी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी कालपासून शोध व बचाव कार्य सुरू होते. यातील काही नागरिकांची सुखरूप सुटका केलेली होती, परंतु अजूनही बरेच नागरिक गावातच अडकलेले आहेत. अशा सर्व नागरिकांसाठी आर्मी, एन डी आर एफ यांच्याशी चर्चा करून पुन्हा शोध व बचाव कार्य सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
माढा तालुक्यातील सुलतानपूर येथे अडकलेल्या नागरिकांसाठी कालपासून एनडीआरएफ मार्फत शोध व बचाव कार्य सुरू होते यातील काही नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले होते परंतु अजूनही तिथे काही नागरिक अडकलेले आहेत. या सर्व नागरिकांसाठी पंढरपूर येथून आर्मी मार्फत फूड पॉकेट व पाणी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी पुन्हा बचाव मोहीम सुरू करण्यात आलेली असून एन डी आर एफ ची एक अतिरिक्त टीम या ठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
काल दुपारी दारफळ सीना येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी आर्मी ची मदत घेऊन एअरलिफ्टिंग करण्यात आले होते, यामध्ये आठ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते, तर उर्वरित 20 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आर्मी शी चर्चा करून पुन्हा बचाव मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले आहे. तसेच दारफळ येथे पाण्याची पातळी कमी झाल्याने बोटी मार्फत ही बचाव करण्याचे काम सुरू आहे. त्याप्रमाणेच माढा तालुक्यातील वाकाव येथे 90 नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यासाठी एनडीआरएफ ची दुसरी टीम पाठवण्यात आलेली असून सांगोला तहसीलदार संतोष कणसे यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंगशी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या काही लोकांना काल सुखरूप ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते, परंतु आजही 14 लोक तिथे अडकलेले आहेत. त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आज सकाळी दोन अतिरिक्त बोट पाठवण्यात आलेल्या असून त्यांना लवकरच तेथून सुखरूप बाहेर काढण्यात येणार आहे. तसेच मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे पुराच्या पाण्यात दोन लोक अडकले होते त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यासाठी दोन बोट पाठवण्यात आलेल्या असून त्यांचे बचाव कार्य सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. तसेच जिल्ह्याच्या ज्या ठिकाणी शेल्टर कॅम्प उभारण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी फूड पॉकेट व पाणी बॉटल ची व्यवस्था करण्यात आलेली असून आज सकाळपासून तिथे पिण्याच्या पाण्याचे टँकरही पाठवण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

