मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात न येण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर रजनी मक्कल मंद्रम हा त्यांच्या राजकीय पक्षाचे विसर्जन करत असल्याचे जाहीर केले आहे. रजनीकांत यांनी हा निर्णय जाहीर केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी सकाळी बैठक घेतली. त्या बैठकीनंतर रजनीकांत यांनी हा निर्णय जाहीर केला. रजनीकांत यांनी सांगितले ‘भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही.’ तसेच रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचे ‘रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’मध्ये रुपांतर करण्यात येईल. तत्पूर्वी सोमवारी सकाळपासूनच अभिनेता रजनीकांत काही तरी मोठी घोषणा करणार असल्याचे वृत्त सातत्याने येत होते. फोरमच्या सदस्यांसोबत बैठकीपूर्वी रजनीकांत यांनी पत्रकारांना सांगितले होते की, त्यांच्या राजकीय प्रवेशावरील अनेक प्रश्नांबाबत त्यात चर्चा केली जाईल. ‘मी राजकारणात प्रवेश करावा की नाही यावर चर्चा केली जाणार आहे. देशातील कोरोनाचा फैलाव, त्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी झालेल्या निवडणुका, माझ्या सिनेमांचे चित्रीकरण आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याआधी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो’, असे ते म्हणाले होते.










