येस न्युज नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केल्यास फार प्रसिद्धी मिळते. म्हणूनच त्यांच्यावर टीका केली जाते, असं राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात सुरु झालेल्या वादामध्ये आता आव्हाड यांनी उडी घेतली असून शरद पवार हे त्यांच्या उंचीसाठी नाही तर कर्तुत्वासाठी ओळखले जातात असंही म्हटलंय.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडावे, अशी मागणी कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहिली होती. त्यामध्ये त्यात महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, असं म्हटलं. मात्र, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केलाय.