नवी दिल्ली : बुधवारच्या विश्रांतीनंतर गुरुवारी पुन्हा एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सदनाच्या कामकाजाला सुरूवात झाली. मात्र, सकाळी ११.०० वाजता कामकाज सुरू होताच कृषी कायदे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेले मृत्यू तसेच पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज अवघ्या काही मिनिटांतच स्थगित करावे लागले .
पहिल्यांदा १२.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेले कामकाज सुरू होताना गोंधळाच्या वातावरणात पुन्हा एकदा दुपारी २.०० वाजेपर्यंत स्थगित करावे लागले . काँग्रेसचे लोकसभा खासदार मनिष तिवारी यांनी पेगॅसस हेरगिरीच्या मुद्यावरून सदनात स्थगन प्रस्ताव नोटीस दिली. या दरम्यान काँग्रेस खासदारांनी तीन कृषी कायद्यांविरोधात संसद परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोअर ग्रुप बैठक घेतली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, कृषी मंत्री नरेंद्र तोमर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी तसंच पीयूष गोयल हेदेखील उपस्थित होते. संसदेतील रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली.