सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ- कुरुल- कामती- तेरा मैल- बसवेश्वर नगर -औराद- बंकलकी आणि वळसंग हा नॅशनल हायवे क्रमांक 465 आता चार पदरी होणार आहे. सुमारे 81.37 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी 740 कोटी रुपये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले आहेत. मात्र हा रस्ता माझ्यामुळेच झाला अशी श्रेय वादाची लढाई आता सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यात सुरू झाली आहे. काम बोलतं… अशी टॅगलाईन देऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाल्याची जाहिरात बाजी केली. पाठपुराव्याला यश अशी टॅगलाईन देऊन आमदार सुभाष देशमुख यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले. सोलापूरच्या विकासाला नवे पंख अशी टॅगलाईन देऊन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना या कामाचे श्रेय दिले आहे. एक प्रकारे ही श्रेय वादाची लढाई आहे. सोलापुरातील शेकडो प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत यासाठी देखील आमदाराने खासदारांनी अशीच विकास कामाची स्पर्धा लावावी अशी सोलापूरकरांची भावना आहे.

