पुणे: काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी (16 मे) पहाटे कोरोनाने निधन झाले आहे. आज सोमवारी (17 मे) हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. खासदार राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. सध्या त्यांचे पार्थिव कळमनुरी येथील कोहिनूर या निवासस्थानातून मोकळ्या जागी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात अनेक कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आहेत.
कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
राजीव सातव यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या जाण्यानं एक पोकळीच निर्माण झाली आहे. राज्याने एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसलं आहे, अशा शब्दात अनेक नेते मंडळींनी दु:ख व्यक्त केलं. हिंगोलीत काँग्रेससह अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे.
पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन
राजीव सातव यांचे काल पहाटे 4 वाजून 58 मिनिटाने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेली त्यांची कोरोना विरुद्धची झुंज अखेर काल संपली.
सातव यांचा अल्प परिचय
45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर बोलत असायचे.
चार वेळा ‘संसदरत्न’
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.