सोलापूर : श्रीकृष्णाबद्दल चमत्कारिक गोष्टी सांगून आपण त्यांच्यावर अन्याय केला आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार कृष्णाने महिलांना गौरवाचे स्थान देण्याबरोबरच चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विरोधात ठामपणे उभे राहून बहुजन समाजाला त्यांनी न्याय देण्याचे महान कार्य केले आहे, असे प्रतिपादन डॉ.गिरीश जाखोटिया यांनी केले. शनिवारी, डॉ. फडकुले सभागृहात सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्यावतीने आयोजित ‘कृष्ण कोण होता?’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. जाखोटिया बोलत होते. प्रास्ताविक माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष जवाहर जाजू यांनी केले.
यावेळी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, माहेश्वरी सभेचे पश्चिम महाराष्ट्र मंत्री चंद्रकांत तापडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जाखोटिया म्हणाले, किशोरवयात कृष्ण गोकूळ वासियांना समजावून सांगतो की, इंद्राची पूजा बंद करा, इंद्र पाऊस पाडत नाही. पाऊस पाडण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक असते. यादव समाजाचा पूर्वज यदू जो राजा ययातीचा पुत्र होता. ययातीचे वडील राजा नहष ज्यांचा नागवंशीय संदर्भ आपणास बहुजनांकडे घेऊन जातो. बहुजनांमधील स्त्री गौरवाची महान परंपरा कृष्ण पुढे चालवतो. याच कारणासाठी त्यांनी अर्जुन आणि पांडवाच्या माध्यमातून भीष्माविरुध्द लढा दिला.
कुरुवंशातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या प्रथांविरुध्द कृष्ण दंड थोपटून उभा राहतो. बहुजनांची निरागसता जपण्यासाठी कृष्णाने प्रत्येक अन्यायी व्यवस्थेला नामोहरम करण्याचे कार्य केले आहे. आजच्या युवकांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील चमत्कारिक गोष्टीला महत्त्व न देता त्यातील मतितार्थ समजून घेतला पाहिजे, असेही जाखोटिया म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरणकुमार राठी यांनी केले. तर आभार मधुसूदन कालाणी यांनी मानले.