संतोष देशमुख यांच्या समोर हत्या झाली असा नव्हे तर ‘शहीद’ हा शब्द लागू शकतो. त्यांचा जो बळी गेलाय, तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेला आहे. त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलायला हवा, त्यामुळे काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली काढण्यात आली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. भारताच्या डीएनए मध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये देखील सद्भावना असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात काँग्रेसच्या वतीने मस्साजोग ते बीड अशी सद्भावना रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीची सुरुवात आज झाली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
ज्या विचारांचे आपण पाईक आहोत. ती शुद्ध भावना आमच्या मनात आहे. ही घटना घडल्यापासून देशमुख कुटुंबीयांचा आणि त्यांच्या कन्येचा बोलताना कुठेही तोल गेलेला नाही. त्यांनी सातत्याने विवेकपूर्ण विचार सर्वांसमोर मांडला आहे. विवेकवादी म्हणून ते आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत. या परिवाराने सद्भावना जोपासली आहे. त्यांनी कोणत्या धर्माला, कोणत्या जातीला नावे ठेवलेली नाही. त्यामुळे वाईट प्रवृत्ती विरोधात आपण सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.










