चित्रकला म्हणले की सुंदर अशी कलाकृती आणि त्यातले कल्पना दृष्टी नजरेत येते आणि मनात भरते. ही चित्रकला अनेक वर्षापासून चालू आहे. इतिहास बघितला तर चित्रकारितेमधून कलाकृती निर्माण करण्याचे खूप पूर्वीपासूनचे माणसाचे प्रयत्न होते आणि ते आजही चालू आहेत. पूर्वीपासून कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत आणि त्याचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, पण आता या चित्रकलेला आणि कलाकृतींना महागाईच्या झळा पोहोचत आहेत. असे वाटते की कलाकारांना, चित्रकारांना, शिल्पकारांना काहीशा आव्हानात्मक महागाईच्या झळा पोहोचत आहेत. सध्याची महागाई पाहता लोकांना उपजीविकेसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंसाठी धडपड करावे लागत आहे. आज महागाई इतकी वाढली आहे की इतरत्र खर्च टाळण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यातच कलाकृती विकत घेणे हे आता आव्हानात्मक बनत चालले आहे. ग्राहक, कलाप्रेमी उद्योजक किंवा सामान्य व्यक्ती कला विकत घेण्यापासून वंचितच आहेत असे दिसून येत आहे.
खरंतर, एखादी कलाकृती विकत घेऊन त्याची किंमत वाढण्याची वाट बघणे आता कमी झाले आहे. पूर्वी एखादा चित्रकार नावारूपाला आला की त्यांची चित्रे लाखो आणि करोडो रुपयाला खरेदी व्हायची, पण ते सध्या आता थोडे कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे चित्रकारांसमोर आव्हानांचा डोंगरच उभा आहे. चित्र निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल हाही खूप महाग झाला आहे. त्यातून कलाकृतीला लागणारे साहित्य हेही खूप महाग होऊन बसले आहे. त्यामुळे एकंदरीतच कलाकृतीची किंमत, चित्र त्याची किंमत वाढत चालली आहे. पण त्याबरोबरच खरेदी करणारा वर्ग हा कमी होत चालला आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी कात्री सापडलेला चित्रकार सध्या संघर्ष करत आहे. आणि चित्र विक्रीसाठी धडपड करत आहे.
कोरोना काळामध्ये अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या. त्यात व्यवसायिक चित्रकार असो किंवा छंद जोपासणारा असो त्यांनी अनेक चित्र काढली आहेत. पण आता त्यांच्यासमोर ते विकण्याचे किंवा अगदी संग्रह करुन ठेवण्याचे ही आवाहन येऊन ठेपले आहे. त्यामुळे ही चित्रे आता विकावीत का? आणि यातून काही रक्कम मिळेल का? हा प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उभा आहे. महागाईच्या मुळे अनेक समस्या चित्रकारांसमोर उभारले आहेत. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न प्रत्येक जण करत आहेत. किंमत कमी करणे हा एकमेव मार्ग असू शकतो, पण त्यामुळे कलाकृतींना योग्य ते दर मिळणार नाहीच हे तर नक्की आहे आणि कलाकारांचा आणि त्यांच्या विचाराचा सन्मान होणार नाही हे तर तेव्हडेच सत्य आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी विविध प्रयत्न केले गेले आहेत. त्यातून एखाद्या प्रयोग म्हणजे सरकारने प्रत्येक शहरांमध्ये आर्ट गॅलरी किंवा आर्ट स्टिट काढावी जेणेकरून या कलाकृती लोकांपर्यंत पोचतील, तसेच सरकारने एखादी कलाकार आणि चित्रकार यांच्यासाठी योजना राबवावी असे वारंवार चित्रकारांकडून मागणी केली जात आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. एकंदरीतच चित्रकारांसाठी खूपच संवेदनशील दिवस आहेत. ज्यांचे पोट पाणी याच चित्रकारितेवर आहे, त्यांच्यासाठी येणारा पुढील काळ खूप संवेदनशील ठरेल आणि यातून एखादं सुखद मार्ग काढायची गरज चित्रकारांना आहे, असे एकंदरीत वाटत आहे.
काही कारणास्तव चित्रकार स्वतःचे नुकसान किंवा दुःख बोलून दाखवू शकत नाही पण दोन्ही बाजूंनी अडकलेला कलाकार आज विक्री करण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. एखाद्या वेळी काहीना नाही पटणार !पण हे सत्य आहे हे त्यांना कलाकारांना माहिती आहे.आज महागाईमुळे सर्व स्तरातून अडकलेला कलाकार आपल्या आपल्या परीने कला विकण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना कला आवडते परंतु विकत घेण्याची धाडस आज दाखवत नाहीयेत, याची खंत चित्रकारांना आणि कलाकारांना तसेच शिल्पकारांना होत आहे.
चित्रकारितेबरोबरच एखादा जोडधंदा किंवा उद्योग करावा म्हणजे पोट पाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. दोन बाजूने कमाई असल्यामुळे रोजच्या जीवनातील गरजा भागत जातील असे मला इथे आवर्जून सांगावे वाटते.कला आणि कलाकार हे दोन्ही कधीही थांबणार नाहीत, याला कधीही थांबा नाही. परिस्थिती कितीही वाईट असो कलाकार कला निर्माण करत राहील, पण ती विकण्याचे आणि लोकांपर्यंत पोहोचायचे प्रयत्न त्याला खूप करावे लागणार आहेत. त्यासाठी त्याला प्रयत्नांती शर्त करावा लागेल आणि उत्तम उत्तम कला निर्माण करून ते लोकांच्या मनात भरले, तरच लोक विकत घेतील. त्यामुळे कलाकारांनी कलेच्या क्षेत्रामध्ये उर्जित अवस्था निर्माण करावी आणि कला निर्माण करत राहावे. विकणे हे एकच उद्दिष्ट न ठेवता कला निर्माण करत राहावे त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो घेत राहवा आणि हे दिवसही जातील आणि पुढे चांगले आणि भरभराटीचे दिवस कलाकारांना येतील अशी मी आशा करतो आहे.