आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवार असे चार दिवस ही विमान सेवा सुरू राहणार
सोलापूर- सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २ ऑगस्ट २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
२८ जून २०२६ पासून स्टार एअरलाईनची सोलापूर-मुंबई विमानसेवा तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आली होती. या मार्गावरील विमानसेवा बंद झाल्याने व्यापारी, उद्योजक, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत होती. सोलापूरकरांनी ही सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्टार एअरलाइन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोलापूर ते मुंबई विमानसेवा तात्काळ सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कंपनीला विमानसेवा सुरू करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.गोरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडेही याबाबत पाठपुरावा केला होता.
या प्रयत्नांना यश आले असून स्टार एअरलाईन कंपनीने २ ऑगस्ट पासून सोलापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांचे ऑनलाइन बुकिंग काउंटर सुरू करून २ ऑगस्ट पासूनच्या सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की,“सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हवाई जोडणी अत्यंत महत्त्वाची आहे. विमानसेवा बंद झाल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आता ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, वैद्यकीय उपचारासाठी जाणारे रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांच्या अडचणीची दखल घेऊन विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्परतेने पावले उचलली. त्यांच्या या पाठबळामुळे सोलापूर–मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होत असून, सोलापूरचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
दरम्यान, सोलापूर-मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक आणि तिकीट दर स्टार एअरलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहेत.
आगमन व प्रस्थान-
सोमवार आणि बुधवार – आगमन सायंकाळी १७:१०(५.१०) वाजता आणि प्रस्थान सायंकाळी १७:४०(५.४०) वाजता.
शुक्रवार आणि रविवार – आगमन दुपारी १३:३०(१.३०) वाजता आणि प्रस्थान दुपारी १४:००(२.००) वाजता.
विमान आगमन व प्रस्थान कालावधी हा दिनांक २ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राहणार असून त्यानंतर वेळेत पुन्हा बदल होणार आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आली आहे.











