आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी असलेल्या अनेक जाचक अटींमुळे नागरिकांचे हाल बेहाल झाले असून गरजू रुग्ण हातबल झाले आहेत.खाजगी रुग्णालयातील उपचार खर्च दिवसेंदिवस वाढत असून सामान्य नागरिकांसाठी आजारावर उपचार घेणे अक्षरशः आवाक्या बाहेर गेले आहे. हे वास्तव ओळखून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार खाजगी रुग्णालयामध्ये मिळण्याची सुविधा आहे.सध्या आयुष्मान कार्ड महा-ई-सेवा केंद्र मार्फत काढून दिले जात आहेत. परंतु हे कार्ड फक्त ज्या नागरिकांना रेशनिंग मिळते त्यांनाच दिले जात असल्याचे चित्र आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अनेकांकडे वैध रेशनकार्ड असूनही तांत्रिक अडचणी, अपूर्ण माहिती, नावातील तफावत आणि ऑनलाईन प्रणालीतील त्रुटी यामुळे आवश्यक आयुष्यमान कार्ड काढता येत नाही. परिणामी पात्र असूनही अनेक कुटुंबे या महत्त्वकांक्षी योजनेपासून वंचित आहेत.अशी पार्श्वभूमी असताना ‘पूर्वी रेशनिंगची अट होती, परंतु आता अशी अट नाही. तहसीलदारांनी सर्व रेशनिंग ऑनलाइन करून बारा अंकी नंबर द्यावेत. तरच सर्वांना आयुष्यमानाचा लाभ घेता येईल.’ असे आयुष्यमान भारत योजनेचे समन्वयक डॉक्टर देविदास बागल यांनी सांगितले.

