मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने तसेच माढा तालुक्यातील माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन्हीही मुलांनी भाजप प्रवेश केल्यामुळे आता जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलू लागली आहेत. मोहोळ तालुक्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या आठ ते दहा दिवसात शक्ती प्रदर्शन करून राजन पाटील गट आता आपली ताकद दाखवणार आहेत. तर माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रिव्र विरोध केला आहे. त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा राग शांत करून त्यांची मनधरणी करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. आता दिलीप माने यांच्या प्रवेशाबाबत भाजप तीन निरीक्षक सोलापुरात पाठवणार असून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहे. दिलीप माने यांचा भाजप प्रवेश 100% निश्चित आहे मात्र आमदार सुभाष देशमुख यांना विश्वासात घेणे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचा राग कमी करण्यासाठी भाजपकडून ‘कासव’ गतीने पावले उचलली जात आहेत . पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्ह्यातील बड्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा चंग बांधल्यामुळे यामध्ये सुभाष देशमुख पिछाडीवर पडतील असे दिसते .

