मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या चालू हंगामासाठी पीकविमा काढण्याची आजची शेवटची मुदत आहे.राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची आज (१५ जुलै) शेवटची मुदत असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, असे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, करोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव आज राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे.पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या चालू हंगामासाठी पीकविमा काढण्याची आजची शेवटची मुदत आहे. याच संदर्भात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली होती. केंद्र सरकारची मुदतवाढ देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले होते . दानवे म्हणाले होते, “केंद्र सरकार पीकविम्याला मुदतवाढ देण्यात तयार आहे. मात्र, त्यासाठी राज्याकडून तसा प्रस्ताव यायला हवा. शेतकऱ्यांची विमा भरण्याची इच्छा असूनही पोर्टल बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यात अडचणी येत आहेत. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्यामुळे मी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली”.









