नियोजन समितीमधुून चारा बियाणांसाठी अतिरिक्त एक कोटीचा निधी तात्काळ मंजूर
जिल्ह्यात सद्यस्थितीत 38 टँकर ने पाणीपुरवठा सुरू आहे
सोलापूर, दिनांक 3:- एल निनो च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2026 अखेरपर्यंत 189 मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. परतीचा पाऊस ही पडला नाही तर चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने तालुका, मंडळ व गावनिहाय चारा उपलब्धतेचे काटेकोरपणे नियोजन करावे. चारा बियाण्यासाठी नियोजन समिती मधून अतिरिक्त एक कोटीचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येत असून जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागात एल निनो च्या संदर्भात पाणी चारा खते बियाणे या अनुषंगाने आढावा जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका आशिष लोकरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवले, उजनी धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता सुभवेंद्र खांडेकर, एमजीपीचे अधीक्षक अभियंता अनिल पाटील, महापालिका सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या चाऱ्याचे योग्य नियोजन करावे. तसेच उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात पुढील तीन महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे तर इतर तालुक्यांमध्ये पुढील चार ते पाच महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून दिसते. परंतु पशुसंवर्धन विभागाने कृषी विभागाच्या तालुका निहाय अधिकारी यांच्या समवेत बसून तालुका, मंडळ व गावनिहाय चारा उपलब्धताची माहिती पुढील आठ दिवसात तयार करावी. तसेच चारा बियाण्यासाठी नियोजन समितीकडून तात्काळ एक कोटीचा अतिरिक्त निधी देण्यात येत असून पशुसंवर्धन विभागाने आवश्यकतेप्रमाणे अधिक निधीची मागणी नियोजन समितीला करावी असेही त्यांनी सूुचित केले.
उजनी धरण 100% भरलेले असून उजनी धरण व्यवस्थापन विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील किती लहान व मध्यम पाणी प्रकल्पातील पाणीसाठा उजनी धरणातून भरलेला आहे याची माहिती दोन दिवसात सादर करावी. तसेच भीमा व सीना नदीवर असलेल्या बॅरेजच्या लोखंडी बर्गे दुरुस्ती साठी नियोजन समितीकडे निधीची मागणी करावी. तर जलसंपदा विभागाने त्यांच्याकडील 39 केटीवेअर दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला सात कोटीच्या निधीची मागणी ही नियोजन समितीला करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.
जिल्ह्यात 30 ऑगस्ट पर्यंत 189 मिलिमीटर पाऊस झालेला असल्याने कृषी विभागाने टंचाईच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील मंडळनिहाय कसा पाऊस झाला आहे त्याची माहिती द्यावी. तसेच टंचाईच्या निकषात बसणाऱ्या मंडळाची व गावांची माहिती घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भोसले यांनी जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्याप्रमाणेच रब्बी हंगामासाठी ही पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देऊन 16 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्ह्यात 105 टक्के खरीपाची पेरणी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात 189 मिलिमीटर पाऊस झाला असून करमाळा तालुक्यात सरासरीच्या 86 टक्के तर इतर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन उपायुक्त श्री विशाल येवले म्हणाले की जिल्ह्यात मोठ्या जनावरांची संख्या बारा लाख तर लहान जनावरांची संख्या आठ लाख इतकी असून प्रतिदिन बावीस हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता असून 52 लाख 400 मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणेच खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच नियोजन समितीकडील दोन कोटीच्या निधीतून 7000 शेतकऱ्यांना चारा पिके घेण्यासाठी बियाणे उपलब्ध करून दिलेले आहे. हा चारा सप्टेंबर अखेरपर्यंत उपलब्ध होईल. तसेच सद्यस्थितीत तीन ते चार महिने पुरेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले. उजनी धरण व्यवस्थापन चे अध्यक्ष अभियंता श्री खांडेकर यांनी उजनी धरण तसेच जिल्ह्यातील विविध लहान व मध्यम पाणी प्रकल्पातील पाणीसाठा विषय माहिती बैठकीत दिली.











