सोलापूर :सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर आधारलेला धडा इतिहासाच्या शालेय पुस्तकांमधून समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी सोलापूर सोशल फाउंडेशन ने मान्यवरांकडे केली आहे.
सोलापूर सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांनी यासंबंधात जाहीर मागणी करणारे पत्रकही प्रसिद्धीस दिले आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे योगदान मोठे राहिलेले आहे. हे आता सर्वांना ज्ञात झालेले आहे परंतु आपल्या देशातल्या भावी पिढीला हा इतिहास माहीत होणे आवश्यक आहे त्यादृष्टीने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात सोलापूरचे चार हुतात्मे, सोलापूर ने स्वातंत्र्याच्या आधीच उपभोगलेले चार दिवसांचे स्वातंत्र्य आणि त्यानंतर ब्रिटिशांनी मार्शल लाॅ पुकारून केलेली दंडेलशाही हा सारा हा इतिहास समाविष्ट करावा अशी मागणी सुभाष देशमुख यांनी केली आहे.
या मागणीच्या प्रती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण राज्यमंत्री, जिल्हाधिकारी आदी मान्यवरांना पाठवण्यात आलेल्या आहेत.
या संबंधात सोलापुरातून सरकार आणि पाठ्यपुस्तके तयार करणाऱ्या यंत्रणावर मोठा दबाव येण्याची गरज आहे. हा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट न केल्यास पुढच्या पिढ्यांना त्यांची माहिती होणार नाही आणि या इतिहासाचे विस्मरण होईल. तेव्हा ही मागणी सर्व बाजूंनी लावून धरली जावी अशी अपेक्षा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.