आज श्री स्वामी समर्थांचा 148 वा पुण्यतिथी सोहळा अक्कलकोट नगरीमध्ये साजरा होत आहे. या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट नगरीमध्ये सकाळपासूनच स्वामी भक्तांनी खूप मोठी गर्दी केली आहे. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अक्कलकोट मधील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर, समाधी मठ, गुरु मंदिर, अन्नछत्र या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्रीची काकड आरती, नगर प्रदक्षिणा, लघु रुद्राभिषेक, नामविणा सप्ताह, महानैवद्य तसेच आरती असे विविध कार्यक्रम आयोजित केले असून याला स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सायंकाळी स्वामी समर्थांच्या पालखीची वटवृक्ष मंदिरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे तर उद्या दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत मंदिरात गोपाळकाला होऊन पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार आहे.

