सोलापूर : शहरातील अत्यंत चांगले रस्ते उद्ध्वस्त करण्याचे काम स्मार्ट सिटी कडून सुरू आहे. कोणत्याही कामाचा ताळमेळ नाही. कोट्यावधी रूपयांचा चुराडा होत असताना सोलापूर महापालिकेतील १०७ नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक आणि शहरातील तीन आमदार व एक खासदार याबाबत ब्र शब्द देखील काढायला तयार नाही. शहराला सुसंगत विकास करणे स्मार्ट सिटी ला अभिप्रेत आहे मात्र केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेला हरताळ फासण्याचे काम सोलापुरात सुरू आहे. स्मार्ट सिटी कंपनी कडून नाविन्यपूर्ण कामे होणे अपेक्षित असताना रस्ते, ड्रेनेज या महापालिकेच्या ‘पारंपारिक’ कामांमध्येच स्मार्ट सिटीने देखील ‘रस’ दाखवला आहे. त्यामुळे चांगले शहर उध्वस्त झाले आहेत. लक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडे सुमारे दोनशे कोटीचे काम आहे. मात्र त्यांना पुन्हा 23 कोटी रुपये वाढवून देण्याचा ‘घाट’ घातला जात आहे.
क्रिसिलने स्मार्ट सिटी कंपनीला चुकीचा सल्ला दिला आणि स्मार्ट सिटी योजनेची ‘वाट’ लावली. तरीही त्यांना 18 कोटी रुपये दिले आहेत. आता सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी मध्ये 50 कोटी रुपये वाढवून द्यावे असा ‘घाट’ घातला जात आहे. शहरातील पाणीपुरवठ्यावर दरवर्षी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. आता शहराच्या मध्यवर्ती भागात स्काडा प्रणालीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १०५ कोटी रुपये स्मार्ट सिटीतुन खर्च होणार आहेत. शिवाय या भागात नळांना मीटर बसवण्यासाठी सुमारे ४० कोटी महापालिकेला खर्च करावे लागणार आहेत. एकूणच पैशांचा मोठा चुराडा सुरु आहे. सोलापूर महापालिकेतील कामे आमदार, खासदार यांची कामे ओव्हर लॅप होत असल्यामुळे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार देखील सुरू झाला आहे. स्मार्ट सिटी कंपनीतील डायरेक्टर देखील मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे शहरातील या ज्वलंत बाराशे कोटींच्या कामाबाबत कोण बोलणार हा खरा प्रश्न आहे.