एकीकडे घराघरात स्वयंपाकात वापरला जाणारा कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणतो, मात्र सद्यस्थितीला हाच कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी चार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. या लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास दोन लाख अधिक खर्च केला. रात्र दिवस मेहनत घेत, खते बियाणांची चांगली मात्रा मिळाल्याने कांदा पीक बहरात होते. त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्यातून फायदा होईल, अशी या शेतकऱ्याची अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने आवक वाढल्याने भाव कोसळले. उत्पन्न तर सोडा मात्र झालेला खर्चसुद्धा मिळण्याच्या आशा मावळल्याने शेतकऱ्याने परिसरात नागरिकांना चार एकरांवरील कांदा फुकट वाटून दिला.