एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत प्रशिक्षणासह टूलकिट व तारणमुक्त कर्जाचा लाभ
पारंपरिक कारागिरांनी योजनेची अधिक माहिती व नोंदणीसाठी www.pmvishwakarma.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन
सोलापूर : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात पात्र होणारा एक ही पारंपारिक कारागीर योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता खादी ग्रामोद्योग विभागाने घ्यावी. तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर अद्याप टूलकिट, अर्थसहाय्य किंवा प्रशिक्षणाचा लाभ मिळालेला नाही, त्या लाभार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
सेवा संकल्प अभियान तसेच लोकसंवाद 2026 अंतर्गत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा तसेच टूलकिट व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम नियोजन भवन येथे पार पडला, त्या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी गोरखनाथ बाबर, नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त आशिष लोकरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, टपाल विभागाचे अधीक्षक रमेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात टूलकिट तसेच कर्ज मंजुरीच्या पत्रांचे वाटप करण्यात आले. टूलकिटचे लाभार्थी शिवाजी काळे, नवनाथ शिंदे व राम पवार यांना टूलकिटचे वाटप करण्यात आले. तसेच प्रदीप रानबुडे (प्रतिनिधी), किशोर माने (प्रतिनिधी-गेजगे) व सचिन लोहार यांना कर्ज मंजुरीच्या पत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे बँकेत प्रलंबित असलेल्या कर्ज प्रकरणाविषयाी माहिती तसेच लाभार्थीने कशा पद्धतीने ऑनलाइन अर्ज करावा याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी केले.
विश्वकर्मा योजनेची माहिती
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या सद्यस्थितीची माहिती- जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 482 लाभार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, 740 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर झाले आहे. त्यापैकी 672 लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 1 हजार 191 लाभार्थ्यांना टूलकिटचे वाटप करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची लाभार्थ्यांना माहिती
प्रभारी जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी बाबर यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली. यामध्ये पारंपरिक शिल्पकार व कारागिरांच्या कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र कारागिरांना शासनाची मान्यता, कौशल्यविकास प्रशिक्षण, टूलकिटसाठी आर्थिक सहाय्य, तारणमुक्त व्यवसाय विकास कर्ज तसेच डिजिटल व्यवहार व विपणनासाठी प्रोत्साहन दिले जाते, असे त्यांनी सांगितले.
योजनेअंतर्गत नोंदणीकृत कारागिरांना ‘विश्वकर्मा’ म्हणून शासनाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येते. कारागिरांच्या कौशल्यवृद्धीसाठी 5 ते 7 दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण तसेच इच्छुक उमेदवारांना 15 दिवसांचे प्रगत प्रशिक्षण घेण्याची सुविधा आहे. प्रशिक्षण काळात दररोज ₹500 विद्यावेतन देण्यात येते.
कारागिरांना व्यवसायासाठी आवश्यक साधने खरेदी करता यावीत यासाठी ₹15 हजारांपर्यंत टूलकिट प्रोत्साहन दिले जाते. तसेच तारणमुक्त व्यवसाय विकास कर्जाची सुविधा उपलब्ध असून, पहिल्या टप्प्यात ₹1 लाख आणि त्यानंतर पात्रतेनुसार ₹2 लाखांपर्यंत कर्जाचा लाभ मिळू शकतो.
योजनेत डिजिटल व्यवहारांना देखील प्रोत्साहन देण्यात आले असून, जास्तीत जास्त 100 डिजिटल व्यवहारांसाठी दर व्यवहार ₹1 प्रोत्साहन दिले जाते. याशिवाय गुणवत्ता प्रमाणपत्र, ब्रँडिंग, ई-कॉमर्स लिंकेज, व्यापार मेळावे, जाहिरात व प्रसिद्धी आदी माध्यमातून कारागिरांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विपणन सहाय्य केले जाते.
सुतार, बोट निर्माता, लोहार, हॅमर व टूल किट मेकर, कुलूप बनविणारे, मूर्तिकार, स्टोन ब्रेकर, सोनार, कुंभार, मोची, पादत्राणे कारागीर, गवंडी, टोपल्या-मॅट-झाडू निर्माता, पारंपरिक खेळणी व बाहुली निर्माता, न्हावी, फुलमाळा बनविणारे, परीट, शिंपी आणि मासेमारी जाळी बनविणारे अशा पारंपरिक व्यवसायातील कारागिरांना योजनेचा लाभ घेता येतो.
पारंपरिक कारागिरांनी योजनेची अधिक माहिती व नोंदणीसाठी www.pmvishwakarma.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.














