दिशा
महाराष्ट्राच्या कृषी-व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी मुंबईत बुधवारी, १६ सप्टेंबर रोजी ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी भक्कम मूल्यसाखळी उभारली जाईल, असा विश्वास पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला व्यापक बाजारपेठ, दर्जेदार प्रक्रिया सुविधा आणि आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा ‘मॅग्नेट २.०’ प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.या प्रकल्पांतर्गत ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेलवर आधारित मोठ्या प्रमाणावर कृषी-व्यवसाय पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे शेतमालाची नासाडी कमी होण्यासोबतच मूल्यवर्धनाच्या संधी आणि निर्यात बाजारपेठेत प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.
तसेच शेतकरी, उत्पादक संस्था, प्रक्रिया उद्योग, निर्यातदार आणि किरकोळ विक्रेते यांना एकाच मूल्यसाखळीत जोडण्याचे काम ‘मॅग्नेट २.०’च्या माध्यमातून केले जाणार आहे.











