सोलापूर – रे नगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 30 हजार घरकुलाचा प्रकल्प सुरू आहे. यातील पंधरा हजार घरकुलाचे चावी वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. परंतु अॅप्रोच रोड शाळा उद्योग व अन्य सोयी सुविधांच्या अभावामुळे बहुतांश लाभार्थी वास्तव्यास आलेले नाहीत. त्यामुळे येथे लाभार्थी येण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रे नगर संदर्भातील अडीअडचणीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, दक्षिण तहसीलदार किरण जमदाडे, म्हाडा सोलापूरचे देशमुख, रे नगर फेडरेशनचे सचिव युसुफ शेख, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रसाद मिरकले यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख तसेच अंकुर पांधे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी रे नगर गृह प्रकल्पाची सर्व माहिती जाणून घेतली. व या ठिकाणी सर्व लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यामध्ये गारमेंट उद्योग रे नगर मध्ये उभारण्यात येणार आहे, त्यासाठी आवश्यक असलेले ट्रेनिंग सेंटर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास विभागाशी समन्वय साधण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पापड व बिडी उद्योग ही पुढील काळात सुरू केले जातील. तसेच रे नगरला राष्ट्रीय मार्ग पासून जोडण्यात येणारा अप्रोच रोड लवकरच म्हाडा मार्फत तयार करण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र जिल्हा परिषदेने त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
शिक्षण विभागाने रे नगर येथे सुरू असलेल्या उर्दू व मराठी शाळेचे बांधकाम डिसेंबर 2026 अखेरपर्यंत पूर्ण करावे. या शाळेसाठी आवश्यक असलेला शिक्षक वर्ग अतिरिक्त समायोजनातून उपलब्ध करून घ्यावा. महिला व बाल विकास विभागाने येथे त्वरित अंगणवाडी सुरू करावी. ज्या लाभार्थ्यांना बँकेने गृह कर्ज दिलेले आहे त्या हप्ते न भरणाऱ्या लाभार्थ्यांनी बँकांचे कर्ज हप्ते वेळेत भरावेत. यासाठी रेनगर फेडरेशननेही लाभार्थ्यांना आवाहन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.
तसेच रे नगर फेज टू अंतर्गतचे जमिनीचे विषयी महसूल प्रशासनाच्या वतीने लवकरच मार्गी लावण्यात येतील असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी म्हाडाचे देशमुख, रेनेगर फेडरेशनचे सचिव शेख, रेणगर गृह प्रकल्पाचे गुत्तेदार अंकुर पंदे यांनी रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या मदती विषयी माहिती बैठकीत दिली.











