सुरुवातीला अगदी संथगतीने काम सुरू असलेल्या दमाणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची गती वाढविण्यात आली आहे. मुख्य रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एकूण 20 पिलर पूर्णपणे उभारण्यात आले असून त्यावर आता लोखंडी गर्डर टाकण्याचे काम बाकी राहिली आहे. दमानी नगरच्या बाजूला मरीआई चौकापर्यंत आणि दुसरीकडे अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत अप्रोच रोडचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. पूर्वीच्या तुलनेत कामाची प्रगती समाधानकारक असून डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे टार्गेट आहे. त्यामुळे आणखी चार महिन्यात इथल्या कामाची गती वाढवावी लागणार आहे. पिलर वरती गर्डर टाकण्यासाठी रेल्वे कडून मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे तसेच रेल्वे उड्डाणपूल झाल्यानंतर रेल्वे कडून याची तपासणी केली जाते आणि त्याच्यानंतरच तो वाहतुकीसाठी खुला केला जातो. त्यामुळे डिसेंबर पर्यंत काम पूर्ण झाले तरीही पुढील सोपस्कार पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी नवीन वर्ष उजाडेल अशी दिसते.







